रावसाहेब दाणवेंचा पराभव, मंत्री सत्तार टोपी काढणार

छत्रपती संभाजीनगर, ८ जून २०२४: जालना लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा धक्का बसला. सहाव्या वेळच्या विजयाचं त्यांचं स्वप्न भंगलं. महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांनी गुलाल उधळला. आता दानवेंच्या पराभवाची कारणं शोधली जात आहेत. या सगळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांचीच जास्त चर्चा होत आहे. त्याचं कारणही आहे. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव होत नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही अशी प्रतिज्ञाच सत्तार यांनी घेतली होती. ही प्रतिज्ञा आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे सत्तारांनी डोक्यावरची टोपी काढण्याचा कार्यक्रमही निश्चित केलाय. छत्रपती संभाजीनगर किंवा सिल्लोड शहरात हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. कार्यक्रमाला एक लाख लोक उपस्थित असतील. रावसाहेब दानवेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. त्यांच्याच साक्षीने डोक्यावरची टोपी काढू, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी स्वतः दिली.

लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीचे कल्याण काळे विजयी झाले. दानवेंच्या पराभवाला अनेक घटक कारणीभूत ठरले. यानंतर प्रसारमाध्यमांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना त्यांच्या जुन्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली. त्यावर सत्तार म्हणाले, मी जी घोषणा केली होती त्यावर मी आजही कायम आहे. योग्य वेळेस तोही कार्यक्रम आम्ही करणार आहोत. टोपी काढण्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रावसाहेब दानवेच असतील. सिल्लोड किंवा छत्रपती संभाजीनगरात हा कार्यक्रम घेऊ. या कार्यक्रमासाठी किमान एक लाख लोकं उपस्थित राहतील. या लाखभर लोकांच्या उपस्थितीत मी टोपी काढणार आहे.

मी एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो होतो. त्यावेळी मी डोक्यावरचे केस काढले होते. टक्कल होतं म्हणून टोपी घातली आणि त्यावेळी शपथ घेतली की जोपर्यंत रावसाहेब दानवे पडणार नाहीत तोपर्यंत टोपी काढणार नाही. आता ते योगायोगाने पडले मी काही त्यांना पाडलेलं नाही. आता टोपी काढण्याचा कार्यक्रम संभाजीनगरात आयोजित करून या कार्यक्रमात रावसाहेब दानवे पाटील यांच्या साक्षीने टोपी काढणार असल्याचे सत्तार म्हणाले.

सत्तारांची प्रतिज्ञा नेमकी काय?
२०१९ च्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी युतीधर्म पाळत जालन्यात रावसाहेब दानवे यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातही दानवेंना लीड मिळवून दिले होते. मात्र यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत दानवेंनी विरोधात काम केले. शेजारच्या मतदारसंघात सभा घेतल्या परंतु, माझ्या मतदारसंघात येऊन प्रचार केला नाही, असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला होता. त्यावेळी शपथ घेतली होती की जोपर्यंत दानवेंचा पराभव होत नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी उतरवणार नाही.

मी प्रचार केला पण काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही
या निवडणुकीतही मी युतीधर्म पाळला. रावसाहेब दानवेंसाठी प्रचार केला. मात्र काही कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी माझा प्रचार केला नाही. याचा राग कार्यकर्त्यांच्या मनात होता. मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना हिशोब चुकता करण्याचे ठरवले होते. त्यामुळे दानवेंचा पराभव झाला, असे सत्तार यावेळी म्हणाले.