मुंबई: लोकसभेत काँग्रेसने १०० जागी विजय संपादन केल्याने टिळक भवनमध्ये मिठाई वाटप

मुंबई, दि. १० जून २०२४: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून महाराष्ट्रात १७ जागा लढवून १३ जागी दैदिप्यमान विजय संपादन केला तर देशभरात १०० जागांवर विजय मिळवल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय दादर येथील टिळक भवनमध्ये केक कापून मिठाई वाटण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. हाजी झाकीर मोईनुद्दीन शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

टिळक भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष डॉ. अमरजिंतसिंह मनहास, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, गजानन देसाई, प्रा. प्रकाश सोनावणे, कोकण पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार रमेश कीर, श्रीरंग बरगे, शिदोरीचे कार्यकारी संपादक दत्तात्रय खांडगे आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या.