नगरमध्ये मविआचे तीन मंत्री होते, पण फक्त भ्रष्टाचार केला: विखे पाटलांचे थोरातांना उत्तर

अहमदनगर, ६ ऑगस्ट २०२४: राज्यातील महायुतीचे सरकार लोकाभिमुख काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता. जिल्ह्याला तीन मंत्री होते पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नव्हता. एकही योजना जिल्ह्यात आणता आली नाही. आज बोलघेवडे पुढारी येऊन करीत असलेल्या टिकेला मी घाबरत नाही. त्यांचे योगदान तरी कायॽ तुमच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचा विकास पुढे नेण्याकरीता कटीबद्ध राहणार आहोत, अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

महसूल पंधरवडानिमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभांचे महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संजय गांधी निराधार अनुदान,‌ इंदिरा गांधी ,‌ श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन, आदिवासी शासकीय प्रमाणपत्र व शिधापत्रिकेचा प्रत्येकी पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कृषी विभागाच्या ११ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात योजनांचा लाभ देण्यात आला.

विखे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत‌ राहाता तालुक्यात ५४ हजार अर्ज भरण्यात आले. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांचे शंभर टक्के वीज बील माफ करण्यात आले. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय शासनाने घेतला. राज्यात जनतेच्या मनातील सरकार आहे. महायुती सरकारमुळे योजनांचा लाभ तुमच्यापर्यंत पोहचत असल्याने सरकारचा लोकाभिमुख कारभार तुमच्या समोर आहे. यामुळेच महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत ५४ हजार महिलांनी अर्ज दाखल केले. उच्च शिक्षण मोफत देऊन मुलीना मोठी संधी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

आज सर्व धरणं भरली आहेत. कालव्यात पाणी सोडले आहे. यामधून तळे भरून देण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यापुर्वी समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मोठा त्रास झाला. कायदा करण्यास कारणीभूत ठरलले यावर बोलायला तयार नाहीत. यासाठी मोठा संघर्षही झाला. न्यायालयीन लढाई केली. आज गावागावात येऊन बोलणारे तेव्हा कुठे होतेॽ असा सवाल त्यांनी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळत विचारला.

तालुक्यातील या मेळाव्यात सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनेत ८१३ लाभार्थ्यांना व कृषी विभागाच्या १२०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. १७ हजार २६३ शेतकऱ्यांच्या खात्यात ९ कोटी ४४ लाखांचे दूध अनुदान देण्यात आले‌. ४४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला‌‌. निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.