मराठवाड्यात भाजपला धक्क्यावर धक्के!

नांदेड, ९ जुलै २०२४ : राज्यात महायुतीमुळे भाजप या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याचं वारंवार समोर येत आहे. यामध्ये मराठवाड्यामध्ये भाजपला तिसरा मोठा धक्का बसला आहे. एकीकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जरी भाजपमध्ये आले असले तरी त्याच नाराजीतून पक्षाचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.

तर भाजपला मराठवाड्यात धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण याअगोदर देखील किन्हाळकरांच्याच नांदेडमधील भाजपनेते सुर्यकांता पाटील यांनी भाजपला रामराम करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर दोनच दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौर आणि भाजप नेते राजू शिंदे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपला सोडत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता नांदेडमध्येच माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. किन्हाळकर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला आहे.

महायुतीमध्ये एकत्र असलेल्या शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षांतील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते नेहमी एकमेकांच्या विरोधात होते. मात्र अचानक एकत्र आल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातून भाजपमधील नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं सत्र सुरू झालं आहे. त्यामुळे भाजप ही गळती कशी थांबवणार? आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही गळती थांबवणं अत्यंत महत्त्वाचं असून त्यासाठी भापची नेमकी रणनीती काय असणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे नेते खबडून जागे झाले. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करुन एकापाठोपाठ एक ‘माधव’ नेत्यांचे पुनर्वसन करण्याची मोहीमच भाजपच्या नेत्यांनी हाती घेतली आहे. त्यात आता यात पंकजा मुंडे आणि भाजपच्या ओबीसी विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांना विधान परिषदेवर संधी दिली. पंकजा मुंडे यांचे मंत्रि‍पदासाठीही नाव चर्चेत आहे. तर महादेव जानकर यांना राज्यसभेचे आश्वासन दिले. त्यानंतर आता राम शिंदे यांनाही बड्या पदावर बसवण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे.