माझे पंख छाटले नाही तर मी थोरातांना पवारांकडे पाठवले: नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

मुंबई, २२ आॅक्टोबर २०२४ : पंख छाटण्याचा प्रश्नच नाही, मीच थोरातांना ठाकरे अन् पवारांकडे पाठवलं, असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलंय. दरम्यान, जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत नाना पटोले उद्धव ठाकरे यांच्यात खडाजंगी सुरु असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आता नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे जागावाटपावर चर्चेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मीच पाठवलं असल्याचं स्पष्ट केलंय.

यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचा जागावाटपावर तोडगा आजच निघायला हवा अशीच आमचीही इच्छा आहे. जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी मीच बाळासाहेब थोरात यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठवलं होतं. जागांबाबत अदलाबदल होऊ शकतो, असा संदेश थोरात यांनी आणला आहे. त्यानंतर आता जागावाटपावर बैठक होणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय.

तसेच काल दिल्लीत मी सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे बाळासाहेब थोरात चर्चेसाठी जाणार आहेत. त्यामुळे माझे पंख छाटल्याचा प्रश्नच येत नाही. माझे पंख छाटलेले नाहीत, आमच्यापेक्षा तुम्ही महायुतीचा सागर बंगल्यावर आणि एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर काय चाललंय, कसे कपडे फाडले जात आहेत, ते दाखवा. तुम्हाला आग लावल्याशिवाय दुसरं कामच नाही, या शब्दांत पटोले यांनी माध्यमांना फटकारलंय.

दरम्यान, मला बाजूला काढलेलं नसून मीच प्रमुख आहे, थोरात यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर माझ्यासमोर अहवाल सादर केलायं. आजच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहोत. बैठकीत चांगली चर्चा व्हावी, हीच आमची अपेक्षा असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलंय.