ईडीला अजित दादांच्या घरच्या पत्त्याचा विसर – कन्हैया कुमार यांचा टोला

कोल्हापुर, २० ऑगस्ट २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करताच अजित पवार भाजपसोबत गेले. त्यावरून नेते कन्हैय्या कुमार यांनी टोल लगावत ” आता ईडी अजित पवारांच्या घरचा पत्ता विसरली” अशी टीका केली.

काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कन्हैय्या कुमार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

कन्हैय्या कुमार म्हणाले, अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत नव्हते तोपर्यंत ते भ्रष्टाचारी होते. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांवर ७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता ते भाजपमध्ये आहेत. आता ईडी झोपेची गोळी खाऊन झोपली आहे. ती आता अजित पवारांच्या घराचा पत्ताही विसरली असल्याचं ते म्हणाले आहेत.

तसेच घराणेशाहीच्या मुद्द्यावरुनही कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. मोदींनी घराणेशाही संपवण्याची गोष्ट केली होती, घराणेशाही भाजपकडे असली तर ती चांगली अन् दुसऱ्याकडे असली तर वाईट, असं कसं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच देशात स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर काँग्रेस आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

व्हॉट्सअपवरच्या मेसेजवर विश्वास ठेवू नका, ते तुमच्यापर्यंत काहीही पोहोचवतील, काहीही खोटं सांगतील. अब्दुलला ११ भाऊ-बहीण आहेत, देशात मुस्लिमांची संख्या वाढतीये, काही काळात त्यांचेच सरकार येऊन शरिया कायदा लागू होईल, संविधान नष्ट होईल, देशात लोकशाही राहणार नाही, असं म्हणत ते घाबरवण्याचा प्रयत्न करतील. पण, तुम्ही घाबरु नका, आपल्या विचारांवर ठाम रहा, असं आवान तरुण पिढीला कन्हैया कुमार यांनी केलं आहे.

दरम्यान, तुमचं लक्ष खोट्या गोष्टींवरुन हटू नये यासाठी ते प्रयत्न करतील. तुम्हाला काहीही सांगून लक्ष विचलीत करतील. पण तुम्ही आपल्या विचारावर ठाम रहा. भाजप तुमच्यासमोर खोटा इतिहास मांडेल. पण, तुम्ही त्याला बळी पडू नका, असं कन्हैया कुमार म्हणाले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप