मराठा आरक्षणाच्या बैठकतीकडे आधी फिरवली पाठ आता मात्र पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांना देऊ साथ; आंदोलकांच्या इशाऱ्याचे पवारांची भूमिका बदलली

पुणे, १२ ऑगस्ट २०२४: विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना राज्य सरकारने मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, त्यावेळी विरोधकांनी या बैठकीला दांडी मारली. त्यानंतर आता रविवारी मराठा आंदोलकांनी शरद पवारांचा ताफा अडविल्यानंतर शरद पवार यांनी भूमिका बदलली आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आमची समन्वयाची भूमिका राहिल, असं पवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पवारांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की, आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी पर्याय काय आहेत? यावर माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी. त्यांना योग्य वाटतं त्या नेत्यांना बोलवावं. या बैठकीला विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही हजर राहू. सर्वपक्षीय बैठकीला मनोज जरांगे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय, ओबीसींच नेतृत्व करणारे छगन भुजबळ यांनाही निमंत्रीत करावं. त्या संयुक्त बैठकीत चर्चा करून आरक्षणाचा तिढा कसा सोडता येईल ते पाहावं, असं शरद पवार म्हणाले.

पुढं ते म्हणाले की, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाहीत, असा केंद्र सरकारचा निर्णय आहे. तामिळनाडूमध्ये सुमारे ७३ टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. तो निर्णय न्यायालयात टिकला होता. त्यानंतर कोर्टाने जे निकाल दिले ते तामिळनाडूसारखे नाही. याचा अर्थ धोरण बदललं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार मोदी सरकारच्या हातात आहे. सरकारने ५० टक्यांवरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे. जर सरकारने ही भूमिका घ्यावी. ५० टक्यांवरील आरक्षणाचं धोरण बदललं तर आम्ही मोदी सरकारला जे हवं ते सहकार्य करायला तयार आहोत. आमची समन्वयाची भूमिका राहील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून सुरू झालं. ते जरांगे पाटलांच्या आडून राजकारण करतात. माझ्या नादी लागू नका, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर बोलताना पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी माझे नाव दोन तीन वेळा का घेतले? हे मला माहीत नाही. मी या मार्गाने जात नाही. माझी तसा इतिहास नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मांडलेली भुमिका दुर्लक्ष करण्याजोगी नाही. ज्याच्या जास्त जागा येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, असं पवार म्हणाले.