अर्थखात्याची शिस्त बिघडवली आता अजितदादांना बाजूला सारण्याचे प्रयत्न; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई, ११ आॅक्टोबर २०२४: राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना महायुतीतून नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. अजित पवार नाराज आहेत अशा चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत. मी नाराज नाही असा खुलासा स्वतः अजित पवार यांनी केल्यानंतर सुद्धा नाराजीच्या चर्चा होतच आहेत. आताही असाच एक प्रसंग घडला आहे ज्यावरून अजितदादांच्या नाराजीला बळ मिळालं आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून फक्त दहाच मिनिटात निघून गेले. पुढे ही बैठक दोन ते अडीच तास चालली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.

दरम्यान, नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून मी गेलो होतो. मी दहा मिनिटांत कॅबिनेट बैठकीतून बाहेर पडलो या ज्या बातम्या येत आहेत त्या साफ खोट्या आहेत, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले होते.

या प्रकारानंतर विरोधकांनी मात्र टीका करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याच मुद्द्यावर महायुतीवर खोचक टीका केली आहे. महायुतीत वाद नेहमीचे आहेत. प्रत्येक कॅबिनेटध्ये वाद होतात. राज्याच्या हिताची ही गोष्ट नाही. त्यांचे वाद फक्त त्यांच्या स्वतःच्या हितासाठी सुरू आहेत. तिजोरीत पैसा नसताना सरकारने ८० निर्णय घेतले याची कुणाला चिंता आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. आज अनेक विभागांत सचिव नाहीत. कृषी विभागातही सचिव नाही. मर्जीतले सचिव बसवून राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सुरू आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

अजित पवार विविध खात्यांचे मंत्री राहिले आहेत. अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. परंतु आता शिस्त बिघडवून सर्व काही सुरू आहे. तिजोरीत पैसे नसताना जीआर काढले जात आहेत. फक्त टक्केवारी मोजण्यासाठी निर्णय घेतले जात आहेत. अजितदादांनी कुठे जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षातून ज्या पद्धतीने माणसे सोडून जात आहेत त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. पण एक आहे की महायुतीच्या नेत्यांकडून अजित पवारांना साइडलाइन करण्याचे प्रयत्न होत आहेत असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

काय म्हणाले होते अजित पवार

मी काल कॅबिनेट बैठक लवकर सोडून गेलो नाही. या बैठकीनंतर लातूर येथे नियोजित कार्यक्रम होता. म्हणून मला नांदेड विमानतळावर जायचं होतं. मंत्रिमंडळाची बैठक ११ वाजता होती. परंतु बैठक उशिरा सुरू झाली. या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतरच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून उदगीर येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघालो होतो. त्यामुळे मी फक्त दहा मिनिटात बैठक सोडली हा जो दावा केला जातो तो खोटा आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.