मध्यरात्री भाजप नेत्याने घेतली जरांगे पाटलांची भेट

जालना, १७ ऑक्टोबर २०२४ ः राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असली तरी मात्र आरक्षणाचा वाद हा पेटलेला आहे. याचे पडसाद विधानसभेत पडू नये यासाठी आता राजकीय नेतेमंडळी सध्या मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या भेटीगाठी घेत आहेत. नुकतेच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे मध्यरात्री जाऊन जरांगे यांची भेट घेत त्यांनी चर्चा देखील केली आहे. या भेटीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरम्यान या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात आता विधानसभेचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबरला निकाल घोषित होणार आहेत. दरम्यान आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आरक्षणाचा विषय महत्वाचा ठरू शकतो. कारण लोकसभेत अनेक मातब्बर नेत्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून पराभवाला सामोरे जावे लागले.

मराठा, ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आचारसंहिता लागताच मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला धारेवर धरत इशारा देखील दिला. त्यानंतर आता भाजप नेत्यांच्या वाहनांची चाके अंतरवाली सराटीकडे वळू लागली आहेत. नुकतेच भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतले असल्याचे समोर आले आहे. विखे पाटील यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा देखील झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

जरांगेची मनधरणी ?
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले व त्यानंतर आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीचा सुपडा साफ करणार, असा इशारा दिला होता. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यानंतर आता भाजप नेते जरांगे यांच्या भेटीसाठी धावाधाव करत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची मध्यरात्री पावणे दोन वाजता भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचे देखील समजते आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगेंनी महायुतीवर तोफ डागली. यामुळे महायुतीकडून मनोज जरांगेंचा मनधरणीचा प्रयत्न सुरु आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

निवडणुकीत फटका नको यासाठी भेटीगाठी
लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच कळीचा ठरला. यामुळे अनेक मतदार संघांमध्ये मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता विधानसभा निवडणुकीमध्ये आपआपल्या पक्षातील उमेदवारांना फटका बसायला नको यासाठी नेतेमंडळी जरांगे यांच्या भेटी घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली आहे. टोपे आणि जरांगे यांच्यात बैठक झाली. अंतरवाली सराटीत ही बैठक पार पडली. यावेळी राजेश टोपे आणि मनोज जरांगे यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.