अजित पवारांचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर? १० आमदारांचा सुप्रिया सुळेंना मेसेज 

मुंबई, ५ जून २०२४: लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्हं असून पहिला भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची चिन्हं आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांच्य दहा आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे. हे दहा आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे विधानसभेच्या आधी अजितदादांसोबत गेलेले आमदार आता शरद पवारांसोबत येणार का हे पाहावं लागेल.

अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंना संदेश पाठवले आहेत. आमदारांनी अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधायचा प्रयत्न  केला असल्याची माहिती  विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळं  अजित पवारांचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. किमान १० आमदारांनी परतीसाठी पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवारांच्या समर्थक आमदारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं. सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जातील असा दावा त्यांनी केला होता. तर ज्या आमदारांनी आतापर्यंत शरद पवारांवर टीका केली नाही त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडे असतील असंही ते म्हणाले होते.

अजित पवारांच्या आमदारांमध्ये चलबिचल

एकीकडे अजित पवार एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंना प्रयत्न केल्याची बातमी आहे. महायुतीच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास असताना त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही आणि महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्येही चलबिचल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आमदारांकडून सुप्रिया सुळेंना संपर्क करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी फुटल्यानंतर ४० हून अधिक आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते. असं असलं तरी लोकसभा निकाल लागल्यानंतर शरद पवारांना मोठं यश मिळालं. शरद पवारांनी १० पैकी ८ खासदार हे निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला. अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू असल्याची माहिती आहे.