आम्हाला संपत्तीचा मोह नाही; ज्यांना होता त्यांनी चुकीचे पाऊल उचललं – एकनाथ शिंदे

पुणे, २० फेब्रुवारी २०२३ः शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाने गुणवत्तेच्या आधारावर दिला आहे. आम्हाला कोणत्याही संपत्ती, प्रॉपर्टीचा मोह नाही. ज्यांना मोह झाला त्यांनी २०१९ला चुकीचे पाऊल उचललं. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत, त्याचा वारसा पुढे नेणार आहोत. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी विविध समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
शिंदे म्हणाले, ‘‘लोकशाहीत निवडणूक आयोग, न्यायालय स्वायत्त आहेत, त्यांना घटना, कायदा आहे. जर निर्णय आपल्या बाजूने लागला तर न्यायव्यवस्था, आयोग चांगला आहे आणि निकाल विरोधात गेल्यावर त्यावर आरोप करायचे हे योग्य नाही. हा निर्णय गुणवत्तेवर दिला आहे. लोकसभा व विधानसभेत आमच्याकडे ७३ टक्के बहुमत आहे. अनेक प्रतिज्ञापत्रही दाखल झाले. नियमानुसार निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे विधीमंडळातील हे कार्यालय ते शिवसेनेचे आहे. आम्हाला कोणत्याही संपत्ती, प्रॉपर्टीचा मोह नाही. ज्यांना मोह झाला त्यांनी २०१९ला चुकीचे पाऊल उचललं. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत, त्याचा वारसा पुढे नेणार आहोत. त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराने २०१९ ला सत्ता स्थापन केली असती तर आमच्यावर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणतीही संपत्ती नको. बाळासाहेबांचा विचार हीच आमच्यासाठी मोठी संपत्ती आहे.
एमपीएससीच्या अध्यक्षांना पत्र देऊन २०२५ नंतर नवीन पॅटर्न लागू करण्याचे सांगितले आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्यासोबत जी घटना घडली त्याचे सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत, चव्हाण यांना सुरक्षा पुरविली जाईल.

ब्राह्मण समाज नाराज नाही
कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तेली, मराठा, सोनार, ब्राह्मण, ख्रिश्‍चन, पंजाबी, शिंपी यासह इतर समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. कसब्यातील जुने वाडे, वाहतूक, पार्किंग, भिडे वाडा या प्रश्‍नांवर चर्चा झाली. या निवडणुकीत ब्राह्मण समाज नाराज नाही, तो महायुतीला मतदान करेल. हा समाज नाराज असल्याचे विरोधकांकडून पसरवले जात आहे. हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ल्या आहे. युती सरकार ज्या धडाडीने निर्णय घेत असल्याने विश्‍वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. विधान परिषदेपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यात. त्यात साडेचार हजार पेक्षा जास्त थेट ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत. ट्रेंड बघायचा असेल तर ग्रामपंचायतीचा बघा, कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही जिंकू, असे शिंदे यांनी सांगितले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप