नरेंद्र मोदींच्या पुढेच उपमुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांचा उल्लेख, नरसय्या आडम यांच्या भाषणामुळे खळबळ

सोलापूर, १९ जानेवारी २०२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्याभराच्या अंतराने पुन्हा एकदा महाराष्ट्रात विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी दाखल झाले आहेत. १२ जानेवारी रोजी मोदींनी नाशिक व नवी मुंबईत विविध प्रकारच्या उपक्रमांचं उद्घाटन केलं होतं. आज मोदी सोलापूर दौऱ्यावर असून तिथे रे नगर या श्रमिक वसाहतीच्या ३० हजार घरांपैकी १५ हजार सदनिकांचं वाटप करण्याच्या कार्यक्रमासाठी मोदींची प्रमुख उपस्थिती होती. मोदींच्या हस्ते यावेळी या सदनिकांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी ज्यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभा राहिला, त्या नरसय्या आडम यांनी भाषणात केलेल्या एका उल्लेखामुळे खुद्द मोदींसह एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांना आश्चर्याचा धक्काच बसला!

सोलापूरमध्ये या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार व माकपचे माजी राज्य सचिव नरसय्या आडम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. २०१९ साली ३० हजार असंघटित कामगारांसाठी घरकुल योजनेचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. ही संकल्पना नरसय्या आडम यांनी मांडली होती. त्यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारला असताना त्यांनी आपल्या भाषणात या प्रकल्पाबाबत भूमिका मांडली.

आडम यांनी भाषणाची सुरुवात करताच समोरील सोलापूरकरांप्रमाणेच व्यासपीठावरील मान्यवरांमध्येही हास्याची लकेर उमटली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार, राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे; असा उल्लेख त्यांनी करताच उपस्थितांमध्ये काही काल हास्याची लकेर उमटली. मात्र, झालेली चूक लागलीच लक्षात आल्यानंतर आडम यांनी यावर दिलगिरी व्यक्त करतानाच चूक दुरुस्तही केली. “माफ करा.. देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे नेहमी येतात त्यामुळे तेच नाव माझ्या तोंडात बसलंय. मी माफी मागतो. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मान्यवर, अधिकारी वर्ग, उपस्थित लोकांनो…”, असं म्हणत त्यांनी भाषणाला पुढे सुरुवात केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमीपूजन झालं होतं. आता या प्रकल्पातील लाभार्थ्यांना चावी देण्यासाठी स्वत: पंतप्रधान इथे आले आहेत. इतकंच नाही, पंतप्रधानांनी करामत करून दाखवली आहे. आम्हाला एक थेंबही पाणी मिळणार नव्हतं. मी पंतप्रधान कार्यालयाकडे गेलो. पंतप्रधानांनी आम्हाला वचन दिलं की एका महिन्याच्या आत एनटीपीसीचं पाणी तुम्हाला मिळेल. आज मोठ्या अभिमानाने मी सांगतो की ते पाणी नाही, गंगा घेऊन आले. २४ तास पाणी आम्हाला देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. इतकंच नाही, आता त्यावर एक पैसाही खर्च लागणार नाही. हे अजरामर काम पंतप्रधानांनी केलं”,

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं यात मोठं सहकार्य होतं. त्यांनी म्हाडाकडून २७० कोटी रुपये बिनव्याजी रे नगरला दिले. मी आज ठामपणे सांगतो की ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत इथले ३० हजार घरं बनून तयार होतील. हे भारतातलं पहिलं श्रमिक शहर तयार होत आहे”, असंही ते म्हणाले. यावेळी आडम यांनी त्यांना सामना कराव्या लागणाऱ्या अनेक समस्याही मोदींसमोर मांडल्या. या समस्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप