शरद पवार गट लोकसभेच्या १५ जागा लढविणार, तयारीला लागा -जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे, २ डिसेंबर २०२३: महाविकास आघाडीचं लोकसभेचं जागा वाटप जवळपास ठरलं आहे. काही जागांवर सामंजस्याने तोडगा काढण्यात येणार आहे. तर काही जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर शरद पवार गटालाही अधिक जागा मिळाल्याची माहिती आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचा गट किती जागा लढवणार याचा आकडाच सांगून टाकला आहे. तसेच काही मतदारसंघांची नावेही सांगितली आहेत.

राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मोठी बातमी दिली आहे. शरद पवार गट लोकसभेच्या १४ ते १५ जागा लढवणार आहे. यात अमरावती, भंडारा, बारामती, सातारा, शिरूर, रायगड, रावेर, दिंडोरी या मतदारसंघाचा समावेश आहे. काही मतदारसंघात आपण उमेदवार बदलणार आहोत. मार्च, एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी आमची तयारी झाली आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या चार लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं सांगितलं होतं. या मतदारसंघात जीवाचं रान करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी शरद पवार गट जे मतदारसंघ लढणार असल्याचं सांगितलं त्यात बारामती, सातारा, शिरूर आणि रायगडचाही समावेश आहे. म्हणजे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजितदादा गट उमेदवार देणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

लढवणार की लढल्याचं दाखवणार?
अजितदादा यांनी त्यांच्या गटाच्या जागा जाहीर केल्या आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांचा पक्ष वेगळा झालेला आहे, त्यांना काही जागा लढवाव्य लागतील. काही मतदारसंघात लढवतील ते. पण ते खरंच लढवणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायचय, असा टोला त्यांनी लगावला.