स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या दुसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर, 3010 पैकी 2812 उमेदवार यशस्वी

मुंबई, दिनांक 14 ऑगस्ट 2023: स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या 6 ऑगस्टला झालेल्या दुसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून 3010 पैकी 2812 उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या दुसऱ्या परीक्षेचा निकाल 94% लागला आहे. पहिल्या परीक्षेचा निकाल 96% लागला होता.

पहिल्या परीक्षेला 423 उमेदवार परीक्षेला बसले होते आणि 405 यशस्वी झाले होते. यावेळी तब्बल सातपट म्हणजे 3010 उमेदवार परीक्षेला बसले आणि 2812 यशस्वी झालेले आहेत.

एजंटस हे ग्राहक आणि विकासक यांच्यातील महत्वाचा दुवा आहेत. एजंटसना ग्राहकांना विनियामक तरतुदींसह व्यवस्थित मार्गदर्शन करता यावे यासाठी विशिष्ठ प्रशिक्षणाच्या आधारे परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक करणारे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (MahaRERA )हे देशातील पहिलेच प्राधिकरण आहे.

या निकालात मुंबईतील 3 महिलांनी 96% गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे.

याशिवाय या यशस्वी उमेदवारांत 2812 पैकी 118 उमेदवार हे 60 वर्षांवरील आहेत. यात 7 महिला असून एकूण 2812 यशस्वी उमेदवारांत 360 महिलांचा समावेश आहे.

6 ऑगस्ट रोजी राज्यात झालेल्या परीक्षेसाठी मुंबई, पुण्यासह पंढरपूर, लातूर,जळगाव, धुळे , अमरावती, अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सांगली , सातारा , सोलापूर भागातील एजंटस परीक्षेला बसले होते.

महारेराने 10 जानेवारी 23 च्या आदेशान्वये एजंटसच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले आहे.

स्थावर संपदा क्षेत्रातील ‘एजंट’ हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे . बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार( Agreement for Sale), घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र ( Allotment letter) चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता
असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे.