नबाव मलिक सत्ताधारी बाकावर बसत असल्याने फडणवीसांचा विरोध

नागपूर, ७ डिसेंबर २०२३: भाजपने देशद्रोही म्हणून टीके केलेले माजी मंत्री नवाब मलिक सध्या जामिनावर सुटले आहेत. कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिम संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्याशी गोवावाला कपाऊंडच्या जमीन व्यवहारात अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुरुंगातून सुटून आल्यानंतर आज ते पहिल्यांदाच राज्याच्या राजकारणात सक्रिय दिसले. तसंच, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हजेरी लावली आणि थेट अजित पवार गटात सत्ताधाऱ्यांच्या बाकड्यावर येऊन बसले.

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून विरोध केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आ. तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सरडा अशी टीका केली आहे.

देशद्रोही म्हणून ज्यांच्यावर टीका केली, त्यानांच तुमच्या सत्तेत सामील करून घेतलं, यावरून सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असं अंबादास दानवे आज विधान परिषदेत म्हणाले. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुरुंगात गेल्यानतंरही तुम्ही त्याचं मंत्रिपद काढायला का तयार नव्हता याचं आधी उत्तर द्या. नवाब मलिकांच्या या मुद्दयावरून तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. याचे पडसाद विधानसभेच्या बाहेरही उमटले. तर, सुषमा अंधारे यांनीही याप्रकरणी एक्सवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

“पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपाने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? देवेंद्र फडणवीस भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!!”, अशी खोचक टीप्पणी सुषमा अंधार यांनी एक्सवर केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत म्हणाले, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की जेलमध्ये व्यक्ती असतानाही आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही. ते आता ही भूमिका मांडत आहेत. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आमच्या बाजूला अजित दादा मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या बाजूला, भुजबळ बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. देशद्रोह्याचा आरोप झाल्यानतंर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर द्या आणि मग आम्हाला प्रश्न विचारा.