शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाविकास आघाडी आक्रमक, मुंबईत होणार मोठे आंदोलन

मुंबई, २८ ऑगस्ट २०२४ ः हे महाफुटीचं सरकार आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. कारभाराने किळस आणली आहे. आम्ही तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद केला होता. पण कोर्टाच्या माध्यमातून त्यावर बंदी घातली होती. मालवणमध्ये पुतळा कोसळला. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा आयोजित केला. त्या मोर्चात मोदी आणि शहांचे दलाल आणि शिवद्रोही आले. ते शिवद्रोही आहेत” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता नारायण राणे, निलेश राणे यांच्यावर टीका केली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दुर्देवी घटना घडत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील गुन्ह्यांची प्रकरणं सारखी बाहेर येत आहेत. त्यामुळे राज्यात रोषाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे मालवणमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राज्यात या घटनांवर संताप व्यक्त केला जात आहे. हा संताप व्यक्त केला जात असतानाच महाविकास आघाडीने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ही तातडीची बैठक बोलावली आहे. खुद्द शरद पवार हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले आहेत.

महाविकास आघाडीने आज ‘मातोश्री’ निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, नाना पटोले, संजय राऊत हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या गंभीर घटना, राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसेच याबाबत महाविकास आघाडीची पुढील रणनीती आणि दिशा ठरवली जाणार आहे.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, “वाऱ्याने पुतळा पडला कारण हे निर्लज्जपणाच कळस गाठणारं सरकार आहे. राज्यपाल कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. पण कोश्यारींची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही. गद्दार केसरकर म्हणाले, चांगलं घडेल” असं उद्धव ठाकरे म्हणाले. १ सप्टेंबरला दुपारी ११ वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून. गेटवेला शिवाजी महाराजाचां पुतळा आहे. तो पुतळा मजबुतीने उभा आहे. आम्ही या पुतळ्यासमोर जमणार आहोत आणि सरकारला जोडे मारो आंदोलन करू. मी आहे तिथे. पवारसाहेब असतील नाना पटोले असतील. सर्व शिवप्रेमींनी यावं अशी विनंती आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “भाजपच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट पटली असेल असं वाटत नाही. ते शिवद्रोही होते तिथे. एकएकाला बघतो असं या शिवद्रोहींनी म्हटलं त्यांचे चेहरे समोर आले.

“आम्ही सरकारच्या प्रतिमेला जोडे मारणार आहोत. सरकारची महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा गडद होत आहे. कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केला होता. त्यांना तरीही हटवलं नव्हतं. म्हणजे यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरलेला आहे. तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही. कोर्ट महाराष्ट्राचं असेल किंवा कोलकात्याचं. मी लक्ष ठेवतोय. ज्यांनी बंद बेकायदेशीर ठरवला. ते भाजपवर काय कारवाई करतोय ते पाहू” असं उद्धव ठाकरे म्हणाले.