जरांगे पाटील यांची कन्याही आरक्षणासाठी आंदोलनाच्या मैदानात

बुलढाणा, १३ सप्टेंबर २०२३ ः मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही संपलेला नाही. मनोज जरांगे पाटलांचं गेल्या १६ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सरकारने मागितलेला एक महिन्याचा कालावधी मनोज जरांगेंनी दिला आहे, परंतु, तरीही त्यांनी अद्याप उपोषण सोडलेलं नाही. जालन्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना त्यांच्या मुलांनी बुलाढाण्यात आंदोलन छेडलं आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची धाकटी कन्या पल्लवी जरांगे पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे.

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटायला येणार आहेत, म्हणजे ते काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊनच येतील. मराठा आता पेठून उठला आहे. आता सरकारला दखल घ्यावीच लागणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही मराठा आहोत, पेटलेलो आहोत, आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही”, असा ठाम निर्धार तिने बोलून दाखवला.

गेल्या १६ दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांनी उपोषण धरलं आहे. त्यामुळे ते उपोषण केव्हा सोडणार असा प्रश्न पल्लवीला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, “उपोषण कधी सुटेल हा त्यांचा प्रश्न आहे. उपोषण कधी सोडणार हे पप्पा सांगणार नाहीत. पण, आरक्षण मिळत नाही तोवर ते उपोषण सोडणार नाहीत हे नक्की.”

मनोज जरांगेंनी १६ दिवसांपासून उपोषण केलं आहे. त्यांची प्रकृती खालावत जात आहे. त्यामुळे वडिलांची काळजी वाटते का? असा प्रश्नही तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, “मुलगी म्हणून पप्पांची काळजी वाटते. ते माझे वडील आहेत. कोणत्या मुलीला वडिलांची काळजी नसते? माझा बाप मला परत हवाय, त्यामुळे आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्या”, अशी आर्त मागणी तिने सरकारकडे यावेळी केली.