“लहान भावाच्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल तर जागा दाखवू” – ओबीसी एल्गार सभेत वडेट्टीवारांचा जरांगेंवर हल्लाबोल

अंबड, १७ नोव्हेंबर २०२३: एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांसह सकल मराठा समाजाने मागणी लावून धरलेली असताना आता ओबीसी समाजही आक्रमक आहे. मराठ्यांना ओबीसीतील आरक्षण देऊ नये याकरता ओबीसींनी आंदोलन छेडलं आहे. मनोज जरांगे पाटलांचा राज्यभर दौरा सुरू असताना आज जालन्यातही ओबीसींची विराट सभा झाली. या आरक्षण बचाव एल्गार सभेला राज्यभरातील सर्वपक्षीय ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जमलेल्या ओबीसी जनसमुदायाला संबोधित केलं.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, “भर उन्हात पिवळं वादळ आलंय. अनेकांना पिवळं केल्याशिवाय सोडणार नाही अशाप्रकारचं हे वादळ आलं आहे. उपस्थित बांधव आणि भगिनींनो आजची ही सभा ओबीसीच्या हक्काला धक्का लावण्याची हिंमत यापुढे कोणाची होणार नाही, अशी ऐतिहासिक सभा आहे. सवाल इस बात का नही शिसा तुटा है की बचा है, सवाल इस बात का है की पत्थर किस तरफ से आया है. जर ओबीसीच्या हक्कासाठी आम्ही लढत असू तर आम्हाला धमकी द्याल तर आम्ही आमच्या पदापेक्षा आमच्या समाजासाठी लढू. पद महत्त्वाचं नाही तर समाज महत्त्वाचा आहे. सत्ता बदलत राहते, कोणासोबत जगायचं हे महत्त्वाचं आहे.

या ३५० जातीच्या समूहाची पिढ्यान पिढ्यांची जमीन कमी झाली, माझी लेकरं गरीब झाले म्हणून सांगत आहेत. तुमच्या जमिनी पिढीजात कमी झाल्या असतील, पण पिढ्यानपिढ्या ज्याच्याकडे जमिनी नाहीत त्याची व्यथा काय असेल याचा विचार तुम्ही करा. २०-५० एकरचा शेतकरी आज पाच एकरवर आला असेल, पण ज्याच्याकडे दोन एकरही नाही तो वीस पिढ्यांतही कुठे असेल याचा विचार तुम्ही करणार नाही? तुम्ही स्वतःला मोठा भाऊ म्हणता. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखं वागलं पाहिजे. लहान भावाच्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दिसल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.