विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार करायचा असेल तर उमेदवार ठेवा; फडणवीसांनी विरोधकांना सुनावल

मुंबई, ५ जुलै २०२४ : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीकडून ९ उमेदवार तर महाविकास आघाडीकडून ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून एक अधिकचा उमेदवार देण्यात आल्याने आमदारांच्या मतांची फोडाफोडी होऊ शकते, अशी शक्यता आहे.

त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सुनावलंय. विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार करायचा असेल तर करा, नाही तर उमेदवार मागे घ्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीत महायुतीकडून ९ उमेदवार देण्यात आले आहेत. ९ उमेदवार निवडून येण्यासाठी महायुतीकडे पुरेसे मते आहेत. मात्र, महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार रिंगणात उभा केला आहे. महाविकास आघाडीला जर घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार ठेवतील नाही तर उमेदवारी मागे घेतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलंय.

तसेच राज्यात विरोधकांकडून रोज नवनवीत आरोप केले जात आहेत. विरोधक रोज खोटं रेटून बोलत आहेत. त्यांनी खोटं रेटून बोलण्याचं नरेटिव्ह ठरवला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी फेक नरेटिव्ह निर्माण करुन मते मिळवली आहेत. आता त्यांनी फेक नरेटिव्ह तयार करण्याची सवय लागलीयं, ते घरी कुटुंबाशीही खरं बोलत नसतील, अशीही सडकून टीका फडणवीसांनी केलीयं.

भारतीय संघाचं विधिमंडळातही अभिनंदन…
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भारतीय संघाच्या अभिनंदनाचा कार्यक्रम आयोजिक केला आहे. विधिमंडळात उद्या भारतीय संघाचं अभिनंदन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अध्यक्षांनी आयोजित केला असून ते याबाबत माहिती देतील, पण आजचा कार्यक्रम जनतेचा आहे , उद्याचा विधानमंडळाचा असणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय.