अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटला; आजच शपथविधी

मुंबई, १५ आॅक्टोबर २०२४ : गेली तीन-चार वर्षांपासून प्रलंबीत असलेला राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारच्या शेवटच्या वर्षातील अंतिम दिवसांत मार्गी लागला आहे. आज मंगळवार (दि. १५ ऑक्टोबर) रोजी दुपारी यातील ७ आमदारांचा शपथविधी होणार आहे. विधीमंडळात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीकडून ८ जणांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागली आहे. शासनाकडून अधिकृ राजपत्र जारी करण्यात आलं आहे.

भाजपकडून बाबुसिंह महाराज, विक्रांत पाटील, चित्रा वाघ यांना संधी दिली आहे. शिवसेनने (शिंदे गट) – माजी खासदार हेमंत पाटील यांना संधी दिली तर मनिषा कायंदे यांना पुन्हा एकदा सहा वर्षाचा कालावधी मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) इदरीस नायकवडी, पंकज भुजबळ यांना संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बाबा सिद्दिकी यांना विधान परिषदेवर घेतली जाणार होते. मात्र तीन दिवसापूर्वीच त्यांची गोळ्या घालून हत्या केल्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीने बदल करत निद्रीस नायकवाडी यांचे नाव निश्चित केले. राष्ट्रवादी काँग्रेस कडून दीपक मानकर, रूपाली चाकणकर यांचे हे नाव चर्चेत होते पण त्यांना डिच्चू देण्यात आलेला आहे.

ठाकरे गट न्यायालयात जाणार?

दरम्यान, महायुतीच्या या निर्णयावर शिवसेना उद्धव ठाकरे गट न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचं समजतय. १२ पैकी ७ जणांची नाव निश्चित केल्यानंतर ठाकरे गटाकडून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संबंधित याचिकेचा निर्णय राखीव असताना आणि वादग्रस्त विषयाचा निर्णय प्रलंबित असताना त्या विषयावर निर्णय घेणे उचित होणार नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.