फडणवीस राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत बैठक

दिल्ली, ७ जून २०२४ ः लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपा चांगलेच हादरे बसले आहेत. ४०० पार’चा नारा असताना भाजपला बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही. तसंच, गेल्यावेळी दोन आकड्यात असलेली भाजप एक आकडी संख्येवर आल्याने राज्यातही मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे राज्य भाजपमध्ये सध्या वातावरण गरम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनाम्यावर ठाम असून यासंदर्भात आज दिल्लीत खलबते होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर फडणवीस हे दिल्लला गेले आहेत. यामध्ये फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली. या भेटीत फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत असं कळतंय. त्यामुळे फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे गृहमंत्री कोण होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आता या प्रकरणात दिल्लीतील भाजपचे हायकंमाडच फडणवीस यांचा फैसला करणार आहेत. फडणवीसांनी राजीनामा दिल्यास पुढे काय करायचं? फडणवीसांना भाजपच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी द्यायची का? फडणवीसांकडील गृहमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं? असे अनेक सवाल आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

फडणवीस यांनी आपल्याला या जबाबदारीतून मोकळ व्हायचं आहे याची घोषणा केल्यानंतर प्रदेश भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. अनेक नेत्यांनी फडणवीस यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर कायम आहेत. त्याच गोष्टीचा फैसला पाडण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. त्यामध्ये आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं.