लाडकी बहिण योजनेत गैरव्यवहार केल्यास खबरदार: मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई, ३ सप्टेंबर २०२४: राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले जात आहेत. दोन कोटीहून अधिक महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलं आहे. मात्र, या योजनेच्या अर्जप्रक्रियेदरम्यान गैरप्रकार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. साताऱ्यात एका व्यक्तीने ३० जणांच्या आधार कार्डचा गैरवापर करून तब्बल ३० अर्ज भरले आहेत. तर पनवेलमध्ये व्यक्तीने एका महिलेचा वेगवेगळ्या पोशाखात फोटो वापरून अर्ज भरला आहे. दरम्यान, या घटनानंतर आता गैरप्रकार करणाऱ्यांना थेट मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांना या घटनांबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, लाडकी बहीण योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी असून यात गैरप्रकार करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“या योजनेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी आहे. यात कोणीही भ्रष्टाचार केला, तर तो खपवून घेतला जाणार नाही. आरोपींना थेट तुरुंगात टाकलं जाईल

जोडे मारो आंदोलनावरून विरोधांवर केली टीका
“शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. मालवणमध्ये झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. शिवरायांचा आदर्श ठेवून आपण राज्यकारभार करत असतो. त्यामुळे यावरून राजकारण करणं दुर्दैवी आहे. पण आपण बघितलं की नुकताच जोडे मारो आंदोलन झालं, यावेळी कुणी कुणाचे जोडे हातात घेतले होते, ते कळलंच नाही, घरात बसलेले लोकही रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्त्यावर येऊन दुसऱ्यांचे जोडे हातात घेतले. एकवेळ कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन जोडे मारले, तर समजू शकतो, पण मोठे नेत्यांनी रस्त्यावर येऊन जोडे मारले, हे दुर्देवी चित्र महाराष्ट्राने बघितलं”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत म्हणाले…
पुढे बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतही भाष्य केलं. “एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू आहे. मागे यासंदर्भात एक बैठक झाली होती. उद्याही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सध्या गणपतीचे दिवस आहेत. त्यामुळे माझी एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे, की त्यांनी नागरिकांना वेठीस धरू नये. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. कुणीही संपावर जाऊ नये”, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.