बलात्काऱ्याला कडक शिक्षेवरून अजित पवारांचे केंद्र सरकारकडे बोट

कोपरगाव, २१ ऑगस्ट २०२४ : बदलापूर घटनेवरून राज्यात वातावरण खवळून निघालेले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवले आहे. बदलापूरसारख्या घटना रोखण्यासाठी, गुन्हेगारांना त्वरित शिक्षा देण्यासाठी विधानसभेत यासाठी कायदा करायला हवा असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न अजितदादादांना विचारण्यात आला होता. त्यावर असा कायदा केंद्र सरकारने करायचा असतो. आम्ही शेवटी केंद्रालाच शिफारस करत असतो असे उत्तर दिले.

मविआ सरकारच्या काळात शक्ती कायदा करण्याचा विचार केला होता. त्यासाठी सरकारने प्रयत्नदेखील केले होते. पण त्यावेळी आपल्याला तो कायदा करता आला नाही असे अजित पवार म्हणाले. शेजारच्या राज्यात असा कायदा करण्यात आला आहे. आम्ही त्यांच्या कायद्याचा अभ्यास करून व आपल्या राज्यातील मागणीसंदर्भात विचार करून एक अहवाल तयार करण्यासाठी समिती गठित केली होती असेही पवार म्हणाले.

यावेळी अजित पवारांनी बलात्काराच्या घटना पाहून काही लोक म्हणतात की, मुलींनी रात्री उशीर झाल्यावर घराबाहेर पडू नये. परंतु, मला ते काही पटत नाही. मुलांनी घराबाहेर पडायचं आणि मुलींनी बाहेर जायचं नाही, हे चुकीचं आहे. मुलींबद्दलचा हा दृष्टीकोन चुकीचा असून, आपण आपलं हे मत बदललं पाहिजे. कारण मुली देखील आपल्या समाजाचा मोठा घटक आहेत. त्याउलट आपण आपल्या माय-माऊली, बहीण व मुलींना संरक्षण दिलं पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

बदलापूर घटनेबाबत कोण काय बोलतयं त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. ज्याला बोलायचं आहे ते बोलतील, मी मात्र मला योग्य वाटेल तेच बोलेन. या घटनेबाबत माझी एकच भावना आहे की असल्या नराधमांना अतिशय कडक शासन केलं पाहिजे. जेणेकरून पुन्हा कोणी असं काहीतरी करण्याचं धाडस करणार नाही. गुन्हेगारांना असं शासन करावं की पुन्हा असं काही करण्याचा विचारही केला नाही पाहिजे.