निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली

सोलापूर, १५ ऑक्टोबर २०२४ : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजताच अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. सोलापूर जिल्ह्याचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष दीपक साळुंखे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. आचारसंहिता लागू होताच मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे.

सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आज अजित पवार गटाला मोठा धक्का दिलाय. पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत त्यांनी येत्या निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिलेत. दीपक साळुंखे यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेच्या तोंडावर अजित पवार गटाच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आता साळुंखे हातात मशाल घेणार का? अपक्ष लढणार, याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे.

दीपक साळुंखे यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी विधानसभेची आगामी निवडणूक अपक्ष लढविणार आहे, असं देखील जाहीर केलंय. मी सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि आमदार शहाजी पाटील यांना मदत केली आहे, त्यामुळे त्यांनी आता संधी द्यावी, असं आवाहन देखील दीपक साळुंखे यांनी केलंय.

सांगोला विधानसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे नेते शहाजी पाटील हे प्रमुख दावेदार आहेत, त्यांच्याविरूद्ध साळुंखे आपले दंड थोपटण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान कोणत्याही परिस्थितीमध्ये मी यंदाची निवडणूक लढविणार आहे, त्यासाठी जर कोणता राजकीय पक्ष मदत करत असेल, तर मी त्याचा विचार करेन, असं देखील साळुंखे यांनी म्हटलंय. दीपक साळुंखे ठाकरे गटाशी देखील संपर्क करत आहेत, अशी माहिती समोर आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

२०२९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी शहाजी पाटील यांना मदत केली होती. त्यामुळे त्यांनी यंदाची निवडणूक माझ्यासाठी सोडून द्यावी, असं आवाहन दीपक साळुंखे यांनी केलंय. तालुक्यातील जनतेनं उभं राहण्यासाठी आग्रह केलाय. जनता हाच माझा पक्ष आहे, असं देखील दीपक साळुंखे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता विधानसभा निवडणूक मी लढवणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता सांगोल्यातील राजकीय घडामोडी कोणतं वळण घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.