सरकारने कारवाई केली नाही तर जितेंद्र आव्हाडांचा मीच वध करणार -परमहंस आचार्य यांचा थेट वादग्रस्त इशारा

अयोध्या, ४ जानेवारी २०२४: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. याच दरम्यान अयोध्येतील परमहंस आचार्य यांनी देखील याच वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा थेट वध करणार असल्याचा इशारा दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
आव्हाडांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना परमहंस आचार्य म्हणाले की, महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केले आहे. ते निंदनीय आणि देशातील राम भक्तांच्या भावना दुखावणारं आहे. त्यामुळे अयोध्येतून मी तपस्वी छावणी पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला मागणी करत आहे. की, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांप्रति अशा प्रकारचे अपमान जनक शब्द वापरणाऱ्या लोकांवर सक्त कारवाई केली पाहिजे.

कारण दुसऱ्या धर्माविषयी अशा प्रकारचे वक्तव्य केलं असतं. तर आतापर्यंतचे जिवंत राहिले नसते. त्यामुळे प्रभू श्री रामांचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यांच्यावर जर सक्त कारवाई झाली नाही. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचा मी वध करेन. असे मी त्यांना आव्हान देत आहे. तसेच त्यांना शास्त्राची माहिती नसेल तर अगोदर त्यांनी ती माहिती घ्यावी. असा सल्लाही यावेळी परमहंस आचार्य यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसाचे शिबिर शिर्डी येथे सुरु आहे. या शिबिराच्या दुसऱ्या सत्रात आव्हाड कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करत होते. अनेक विषयांवर भाष्य करत असताना आव्हाड यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी त्यानी रामाविषयी मोठं विधान केलं. राम हा बहुजनाचा होता. राम मांसाहारी होता. तुम्ही आम्हाला का शाकाहार शिकवत आहात. ते चौदा वर्ष जंगलात राहत होते, असं असताना ते केवळ कंदमुळे खात होते का? ते शाकाहारी कसे असू शकतात, तर नाही. ते मांसाहार देखील करत होते, असं आव्हाड यांनी केलं. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जातोय, असंही आव्हाड म्हणाले. त्यानंतर सर्वपक्षांमधून आव्हाडांवर जोरदार टीका केली जात आहे. त्यांच्याविरोधात आंदोलन केली जात आहेत.

तसेच आव्हाड यांना अटक करण्याची मागणी होत असताना आता आव्हाड यांनी स्वतःच माध्यमांसमोर येत या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. काल माझं सगळं भाषण चांगलं झालं. तरीही फक्त एका वाक्यामुळे जे वाक्य मी बोललो. त्याप्रती लोकांच्या ज्या भावना आहेत त्यावर मी खेद व्यक्त करतो. काल बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. लोकभावनांचा आदर करणं महत्वाचं आहे. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.